5 Aug 2016

पोलिस दलाला "पुरंदरे पॅटर्न'चे वरदान

 संजय पुरंदरे
मो. 9923061999

नागपूर ः शालेय किंवा महाविद्यालयीन मुलीचे वाकडे पाऊल पडले किंवा तिचा कुणी गैरफायदा घेतला तर तिच्यासह संपूर्ण कुटूंबियांना अनेक झळा सोसाव्या लागतात. तिचे शिक्षण सुटू शकते तर आईवडीलही बदनामीपोटी स्थलांतर करतात. एका चुकीची शिक्षा संपूर्ण कुटूंबाच्या वाताहतीला जबाबदार असते, ही बाब कुठेतरी मनात बोचत असल्यामुळे पोलिस निरीक्षक संजय पुरंदरे यांनी मुलींच्या सुरक्षिततेकरिता काहीतरी करण्याचे ठरविले. त्यातूनच "पुरंदरे पॅटर्न'चा जन्म झाला. विद्यार्थीनींसह ग्रामीण भागात मौजमजा करायला येणाऱ्या प्रेमीयुगुलांवर कोणतीही कारवाई न करता केवळ पालकांच्या स्वाधीन करावे, एवढी साधी आणि सोपी संकल्पना त्यांनी मांडली. हीच संकल्पना पुढे "पुरंदरे पॅटर्न' म्हणून नावारूपास आली. केवळ नागपूरच नव्हे तर हा पॅटर्न राज्यातील अनेक जिल्ह्यांनी अवलंबविला. या पॅटर्नमुळे अनेक मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचले. या पॅटर्नची पोलिस अधीक्षकच नव्हे तर गृहमंत्र्यांनीसुद्धा दखल घेतली होती, हे विशेष.
संजय वसंतराव पुरंदरे हे मूळचे पुण्यातील एका खेडेगावचे. वडील शेतकरी असल्याने त्यांच्यासह शेतीत राबताना शिक्षण घेतले. त्यावेळी पुण्यात खाकी वर्दीची क्रेझ होती. त्यांनीही पदवी घेतल्यानंतर लगेच एमपीएसची परीक्षेची तयारी केली. 1988 ला परीक्षा उत्तीर्ण आणि वयाच्या 21 व्या वर्षी अंगावर खाकी वर्दी. मुलगा अधिकारी झाल्याने आई शशिकला यांचा आनंद गगनात मावेनासा. पहिलीच पोस्टींग गुन्हेगारीसाठी नावाजलेल्या नागपूरमध्ये. वाडीत असताना गणेश पाटील या गुन्हेगारीची दहशत होती. क्राईम कंट्रोलची जबाबदारी असल्याने रूजू झाल्याच्या पाचव्याच दिवशी गणेशची चौकातून धुलाई करीत पोलिस ठाण्यात हजर केला. त्यामुळे दरारा निर्माण होऊन त्याच्या साथिदारांमध्ये खळबळ. पोलिस खात्यातील सर्वाधिक दांडगा जनसंपर्क आणि शिस्तप्रीय असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. 2004 मध्ये कन्हानमध्ये खंडणी, वसूली, आणि गॅंगवार सुरू होते. ठाणेदार म्हणून रूजू होताच, अखंड काम करीत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले. "गुन्हेगारीमुक्‍त कन्हान' अभियान राबवून वचक निर्माण केला. चिडीमारी आणि छेडखानी करणाऱ्यांची त्यांना खूप चिड आहे. त्यामुळे कॉलेज किंवा रस्त्यावर चिडीमारी करणाऱ्यांची चौकातच धुलाई करायचे, त्यामुळे मुली आणि महिलांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले. एसीबीमध्ये असताना कारवाईची शैली आणि पूर्वतयारी यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या कार्यकाळात जनसंपर्कामुळे अनेकांनी लाचखोरांविरूद्ध आवाज उठविला. एसीबीला सामान्यांपर्यंत पोहचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सुपरक्‍लासवनपर्यंतच्या अधिकाऱ्यांवर ट्रॅप केल्याचे ते साक्षिदार आहेत. 2007 मध्ये खैरलांजी प्रकरणी कामठीत दंगल उसळली तर दुसऱ्या दिवशी खापरखेड्यात मोर्चा होता. अपुरे मनुष्यबळ असताना केवळ आत्मविश्‍वास आणि वैयक्‍तिक संबंधाच्या बळावर मोर्चा शांततेत पार पडला, याची दखल अधीक्षकांनी घेतली होती. "पोलिस मित्र' ही संकल्पना त्यांनी 2001 पासूनच अंमलात आणली होती. प्रत्येक गावांत त्यांनी फळी निर्माण केली होती. केळवदला एकाचा खून करून तणसाच्या गंजीत जाळला होता. कोणताही धागा नव्हता. मात्र, केवळ खबऱ्याच्या मदतीने त्यांनी तीन दिवसांत आरोपीस अटक केली. पत्नी सुजाता यांची मोलाची साथ ही यशाचे गमक असल्याचे ते सांगतात. सध्या संजय पुरंदरे हे जिल्हा एलसीबीचे प्रमुख आहेत.

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates