16 Aug 2016

जिद्‌द, परीश्रम आणि संयम म्हणजेच "यश'

डॉ. निलेश पांडे
मो. 8793730097
...............
नागपूर ः ध्येय गाठण्यासाठी मनात दृढइच्छाशक्‍ती आणि आत्मविश्‍वास पाहिजे. जिद्‌द, परीश्रम, सातत्य आणि संयम या चार गोष्टी जर मनी बाळगल्या तर यश नक्‍कीच मिळेल. काहीतरी मोठे मिळविण्यासाठी स्वप्नेसुद्धा मोठीच बघा. आयुष्याला ताळेबंद करून नियोजन करा. अपयश पचविण्याची क्षमता मनात निर्माण करण्याची गरज प्रत्येक युवकांमध्ये आहे. असाच काही संघर्षमय प्रवास नागपूर पोलिस खात्यातील सहायक पोलिस आयुक्‍त डॉ.निलेश पांडे यांनी अनुभवला.
डॉ. निलेश पांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्‍यात असलेल्या धनकवाडी या खेड्यातील. वडील वनविभागात नोकरीला तर आई कमलाताई गृहिणी. वर्दीधारक वडील शिस्तप्रीय होते. त्यामुळे वेळेवर अभ्यास करावा लागे. प्राथमिक शिक्षण वाशिम जिल्ह्यातील मेडशी या खेड्यात झाले तर उच्च माध्यमिक शिवाजी महाविद्यालय अकोट येथून. मुलाने मिलीटरी फोर्समध्ये जावे, अंगावर वर्दी चढवून देशसेवा करावी, अशी वडीलांची इच्छा तर डॉ. निलेश यांचे मेडीकल फिल्ड निवडून डॉक्‍टर व्हायचे स्वप्न. बारावीनंतर शासकीय मेडीकल हॉस्पिटल वरळी-मुंबई येथे शिक्षणासाठी गेले. मुंबईतील खर्च बघता आर्थिक चणचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी "अर्न अँड लर्न' हा फार्म्यूला वापरला. दिवसा कॉलेज तर रात्री हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. 2004 ते 2010 पर्यंत पदवी घेऊन डॉक्‍टर व्हायचे स्वप्न पूर्ण झाले. कुठेतरी क्‍लिनिक उघडावे किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करावी, असे वाटत नव्हते. अंगावर वर्दी चढविण्याचे वडीलाचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याने त्यांनी पोलिस विभागाची निवड केली. विशिष्ट ध्येय आणि आकांक्षा बाळगून 2010 मध्ये पुणे गाठले. त्यावेळी क्‍लासमेट डॉ. प्रशांत जाधव सोबत होता. त्यावेळी कृषि अधिकारी असलेले काका किशोर पांडे आणि आनंद दादा यांनी मदत आणि मोलाचे मार्गदर्शन केले. घरावर तुळशीपत्र ठेवले आणि झपाटल्यासारखा अभ्यास सुरू केला. सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत वाचनालयात मुक्‍काम. वृत्तपत्रांचे नियमित वाचन. अभ्यास आणि वेळेचे नियोजन केले. दरम्यान पीएसआय, एसटीआय परीक्षा दिल्या. जुलै 2011 मध्ये पोलिस उपाधीक्षक (डीवायएसपी) परीक्षा दिली. पहिल्याच झटक्‍यात क्‍लासवन नोकरी. नाशिकला प्रशिक्षण घेतल्यानंतर परीविक्षाधीन अधिकारी म्हणून रत्नागिरीत तैनाती. जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गावठी दारूच्या भट्ट्या लक्ष्य केल्या. मोठमोठ्या भट्ट्या उद्धवस्त केल्या. 2015 मध्ये नागपुरात एसीपी म्हणून बदली. डीसीपी अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात वाटचाल सुरू आहे. कामठीसारख्या संवेदनशिल शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी जबाबदारी. दांडगा जनसंपर्क असल्यामुळे अप्रीय घटनेला प्रतिबंध आहे. कोम्बींग, अवैध वाहतूक, रेती तस्करी, गुन्हेगारांच्या हालचालींवर वॉच आहे. मोक्‍का, एमपीडीए व प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. एमपीएससीमध्ये विदर्भातील टक्‍का कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गांभार्याने अभ्यास करावा. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन हवे, त्यांच्यासाठी सदैव तत्पर असल्याचे ते सांगतात. उच्चशिक्षित असलेली पत्नी शीतल यांनी वेळोवेळी मोलाची साथ दिली. त्यामुळे यशाच्या शिखराकडे मार्गक्रमन करीत असल्याचे ते सांगतात.

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates