14 Aug 2016

"बजरंगी' संघर्ष

 बजरंग साळूंखे
मो. 9657587806
..........

नागपूर ः शेतात नापिकी तर घरची परिस्थिती हालाकीची. त्यामुळे शिक्षण घेण्यासही पैसे नाही. परंतु शिक्षण घेण्याची जिद्‌द. अशा स्थितीत सुदामाच्या मदतीला कृष्ण यावा, असे दोन मित्र धावून आले. त्यांनी एका भाकरीतील अर्धी भाकर दिली. कसेबसे जीवन जगत कठोर परीश्रम घेतले. सलग 17 ते 18 तास अभ्यास केला. मित्रांनीच दिलेले पैसे आणि कपडे घालून एमपीएससीची परीक्षा दिली आणि शेवटी यश पदरात पडले. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. अनेकांचा विश्‍वासच बसेना. शेवटी वर्दी घालूनच गावात प्रवेश केल्यानंतर गावकऱ्यांनी डोक्‍यावर उचलून घेतले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही संघर्षगाथा आहे नागपूर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक बजरंग साळूंखे यांची. त्यांना आजही गरीबीची जाणीव आहे. पंचक्रोशितील एकमेव पोलिस अधिकारी म्हणून साळूंखे यांची ओळख आहे.
बजरंग पांडूरंग साळूंखे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील माळवाडी या खेड्यातील. घरी जेमतेम शेती. वडील गावाशेजारी असलेल्या किर्लोसकर कारखान्यात कामाला. साळूंखे हे पाच दिवस शाळेत तर शनिवार-रविवार शेतात राबायला. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी धडपड. मोठा संघर्ष करीत एम.एस्सी (मॅथ) पर्यंत शिक्षण घेतले. डीग्री मिळाली पण हाताला काम नाही, त्यामुळे यक्षप्रश्‍न समोर. साळूंखे यांनी सांगलीला जाऊन नोकरीसाठी प्रयत्न केले, मात्र सुरूवातीला अपयश आल्याने हताश होऊन गावात परत आले. गावातील सुरेश पाटील आणि सुरेश मोकाशी या दोन मित्रांनी साळूंखे यांचे कष्ट बघितले होते. मित्रांनी सांगलीला नेले. छोट्याशा रूममध्ये राहणे आणि अर्ध्याच डब्यात दोघे जेवन करायचे. घरमालकाला दिसू नये म्हणून रात्री उशिरा रूमवर जायचे तर पहाटे पाच वाजताच निघून जायचे, असा नित्यक्रम. इंजिनिअर होण्याची इच्छा मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अशक्‍य. वाचनालयात सकाळी सहा पासून ते रात्री 12 पर्यंत सतत अभ्यास केला. दरम्यान श्रीहरी पाटील आणि शरद पाटील या दोन मित्रांनी पुस्तकांची मदत केली. 1991 साली एमपीएससी उत्तीर्ण. मुलाखतीसाठी पुण्याला जायचे होते. सुरेशचेच कपडे घातले. भर उन्हात मैदानावर धावताना पाय भाजल्याने फोड आले होते. मात्र, जिद्‌द, चिकाटीमुळे पीएसआयपदी निवड. धारावी ठाण्यात असताना आरोपींनी एका मच्छीविक्रेत्या दाम्पत्याचा खून करून अर्धवट जाळले. साळूंखे यांनी तपास हाती घेताच गोरखपूरवरून आरोपीस अटक केली. त्यांनी वाहतूक विभागाचे प्रभारी आयुक्‍तपदही सांभाळले आहेत. त्यांनी 16, 860 हेल्मेट तर 3502 मद्यपींवर कारवाई केली. शहरातील अपघात नियंत्रण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुख्यमंत्री आणि व्हीव्हीआयपी यांच्या बंदोबस्त ताफ्यात पायलट म्हणून साळूंखे असतात. नागपुरात झालेल्या अपघातांत 12 व्यक्‍तीचे प्राण त्यांनी वाचविले आहेत. पत्नी कल्पना यांना गरीबी आणि संघर्षाची जाण असल्यामुळे आजही तेवढ्याच गर्वाने मान उंच असल्याचे ते सांगतात. सध्या ते इंदोरा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
-अनिल कांबळे







Mr.Anil Kamble
Crime Reporter
SAKAL,
Nagpur.
8308695600

andykamble1@gmail.com

0 comments:

Post a Comment

 
Blogger Templates