23 Jul 2016

कुख्यात रेड्डी गॅंगशी एकट्याने घेतला पंगा

धर्मेंद्र नितनवरे
मध्यरात्रीच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये काहीतरी वेगळेच चित्र दिसले. गणेशपेठमध्ये पॅट्रोलिंगवर असलेले धर्मेंद्र नितनवरे यांना संशय आला. त्यांनी कारजवळ जाऊन चौकशी केली. मात्र, क्षणार्धात त्यांना धोक्‍याची सूचना मिळाली. त्यांनी लगेच चालकाला खाली उतरण्यास सांगितले. मात्र, चालकाने कार भरधाव पळविण्याचा प्रयत्न केला. धमेंद्र यांनी धावत्या कारमधील चालकाची मान हातात करकचून धरली आणि त्याला थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या रेड्डी गॅंगशी त्यांनी दोन हात केले. त्यानंतर काही वेळातच अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन रेड्डी टोळीतील 9 जणांना अटक केली. धमेंद्र यांनी दाखविलेल्या जिगरबाजपणामुळे कुख्यात टोळीला पकडण्यात यश आले. त्यांच्या कर्तबगारीचा तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश धनविजय यांनी सत्कार केला. पोलिस विभागासाठी गौरवास्पद कामगिरी केल्याने त्यांना गौरविण्यात आले.
धर्मेंद्र नारायण नितनवरे (रा. कुकडे ले-आउट) 1996 ला पोलिस खात्यात भरती झाले. वडील पोलिस विभागातून सहपोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त आहेत. वडील अंगावर पोलिस वर्दी चढवत असताना त्यांना खाकीबद्दल आकर्षण वाटत होते. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वाभिमानी बनण्याचा वडिलांचा मंत्र कायम लक्षात ठेवत त्यांनी लोहमार्ग पोलिसांच्या मैदानावर जाऊन प्रॅक्‍टिस करण्यास सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात पोलिस शिपाई म्हणून निवड झाली. सेवा आणि संरक्षण हीच आपली कमाई असल्याचे वडिलांनी डोक्‍यात भिनवून ठेवले होते. त्यामुळे अंगावर वर्दी घालून वडिलांचा वसा पुढे नेण्यास सज्ज झाल्याचे ते सांगतात.
गणेशपेठ पोलिस ठाण्यात तैनात असताना संवेदनशील मध्यवर्ती बसस्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. जबाबदारीला आव्हान म्हणून स्वीकारले. बसस्थानकावर खिसेकापू, गांजाविक्रेते किंवा ओढणारे, भुरट्या चोरांवर वॉच ठेवला. अनेक चोरट्यांना भरचौकात किंवा बसस्थानकावर चोप दिल्याने पोलिसांचा धाक निर्माण झाला. 24 एप्रिल 2012 रोजी स्वाती खागर या महिलेचे 18 तोळे सोन्याचे दागिने आणि नगदी 50 हजार रुपये असलेली बॅग एका बसमध्ये राहिली. सैरभर झालेल्या स्वाती यांनी धर्मेंद्र यांना हकिकत सांगितली. क्षणाचाही विलंब न करता धर्मेंद्र यांनी बस क्रमांक घेतला आणि त्या बसचा दुचाकीने भरधाव पाठलाग केला. नागपूरपासून 40 किमी गेल्यानंतर बसला थांबवून बॅग महिलेच्या स्वाधीन केली. धर्मेंद्र वाहतूक पोलिसांत असताना नीरीजवळ युवती दुचाकीवरून फिट येऊन खाली पडली. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवतीच्या मदतीस कुणीही धावले नाही. धर्मेंद्र यांनी युवतीला हातावर उचलून दवाखान्यात नेले. तिचा जीव वाचला. आयुष्यातील अनेक चढ-उतारात पत्नी वैशालीची मोलाची साथ असल्याने अनेक संकटांना धैर्याने तोंड देत असल्याचे ते आवर्जून सांगतात.
 
Blogger Templates