अरविंद सराफ
नागपूर ः एक जून 2006 च्या रात्री तीन आतंकवादी लाल दिव्याच्या गाडीतून संघ मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी आले. दरम्यान, गस्तीवरील स्पेशल स्कॉडचे पोलिस अधिकारी अरविंद सराफ यांना संशय आला. क्षणार्धात त्यांनी दोन्ही हातात पिस्तूल घेऊन फायरिंग सुरू केली. प्रत्युत्तरात आतंकवाद्यांनीही फायरिंग केली. एक गोळी पोटात घुसल्यानंतरही सराफ यांनी गोळ्या झाडणे सुरू ठेवले. आतंकवाद्यांचा खात्मा केल्याची खात्री केल्यानंतरच त्यांनी गोळी लागल्याचे सहकाऱ्यांना सांगितले. अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखून सराफ यांना रुणालयात दाखल केले.
अरविंद सराफ सामान्य कुटुंबातील युवक. वडील पॅरामिलिटरी फोर्समध्ये असल्यामुळे देशसेवेचे बाळकडून बालपणापासूनच भिनले. चीनविरुद्धच्या युद्धात वडील प्रल्हाद सराफ यांना पाय गमवावा लागला. मुलगा अरविंद यांना संरक्षण सेवेतच पाठविण्याचा त्यांचा चंग होता. बारावीत मेरिट आलेले अरविंद हे 1982 मध्ये रेल्वे पोलिसमध्ये दाखल झाले. खंडाळा येथे झालेल्या ट्रेनिंगमध्ये राज्यातून "बेस्ट कॅडेट' म्हणून पुरस्कार मिळविला. चार वर्षे नोकरी केल्यानंतर एसआयडी, नक्षलग्रस्त भाग व आयबी (इंटेलिजन्स ब्युरो)मध्ये नोकरी केली. 1986 मध्ये त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, वडिलांच्या प्रकृतीमुळे ते मुलाखतीला जाऊ शकले नाहीत. 2002 मध्ये पुन्हा एमपीएससी परीक्षा पास केली व पोलिस उपनिरीक्षक बनले.
गणेशपेठ पोलिस ठाण्यात ड्यूटी करीत असताना "बेस्ट पोलिस स्टेशन अवॉर्ड' ठाण्याला मिळवून दिला. तसेच पोलिस विभागात सर्वाधिक 13 वेळा "बेस्ट पोलिस ऑफिसर'चा खिताब पटकावणारे ते एकमेव अधिकारी आहेत. निडर पोलिस अधिकारी म्हणून ओळख असल्याने त्यांच्यावर "स्पेशल स्क्वॉड'चे अधिकारी म्हणून जबाबदारी दिली. दिल्लीतून आयबीचा संदेश असल्यामुळे पोलिस आयुक्तांनी सराफ यांच्या टीमला अलर्ट राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ते व्हर्नेबल पॉइंट्सवर गस्त घालत होते. मध्यरात्रीच्या सुमारास लाल दिव्याची कार आली. बडकस चौकात असलेल्या सराफ यांना ते वरिष्ठ पोलिस अधिकारी वाटले. मात्र, पोलिसांच्या वेशात असलेले तिघे अस्ताव्यस्तपणे बसलेले दिसले. सराफ यांनी लगेच गाडीचा पाठलाग केला. संघ मुख्यालयाच्या दिशेने गाडी वळताच त्यांनी दोन्ही पिस्तूल हातात घेऊन सहकाऱ्यांना सूचना दिल्या. काही वेळातच दोन्हीकडून अंदाधुंद फायरिंग सुरू झाली. मात्र, सराफ यांच्या सतर्कतेमुळे संघ मुख्यालय उडविण्याचा कट हाणून पाडल्या गेला.