19 Oct 2016

तुमच्यासाठी बसची वेळ बदलायची का?

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे ग्रामीण विद्यार्थिनींना उत्तर


विनोद पिल्लेवान
बातमीदार, उमरेड
बस क्रमांक : एम. एच. 40 एन- 8003
उमरेड ते रानबोडी


कचाकच ब्रेक मारत बस आली. नेहमीप्रमाणे बस थांब्यापासून सुमारे 100 मीटर पुढेच थांबविली. प्रतीक्षेतील प्रवाशांनी दारापाशी येऊन गर्दी केली. "आधी मी, आधी मी' म्हणत चढण्यासाठी चढाओढ सुरू झाली. काहींनी खिडकीजवळ जाऊन रुमाल टाकले. बस सुटू नये म्हणून आयाबाया पळत जाऊन आत चढत होत्या. कंडक्‍टर आला. त्याने बेल मारली आणि ती बस रानबोडीच्या दिशेनं निघाली.

"खासगीपेक्षा एसटी बरी' ही म्हण सपेशल खोटी ठरवत हा प्रवास सुरू झाला. उमरेड येथीलच एका थांब्यावरून काही प्रवासी बसले. रानबोडी हे गाव उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या कुशीत आहे. एकूण 17 किलोमीटर अंतराच्या प्रवासात तिरखुरा, कऱ्हाडंला व रानबोडी ही तीन गावे येतात.

अग्निशमनला हवा प्रथमोपचार
बसमध्ये प्रथमोपचार पेटी नावालाच होती. त्यातील साहित्य काढणे हेच जिकरीचे काम होते, अशी पेटी बसमध्ये का ठेवतात, असा प्रश्‍न पडला. आत साहित्य आहे की नाही, हेदेखील वाहकाला ठाऊक नाही. बसमधल्या अग्निशमन यंत्राला धूळ चढली होती.

बसअभावी करावा लागतो मुक्काम
वाहकाच्या मागील आसनावर प्रणाली मेश्राम व मेघा नरुले या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्या नेहमीच या बसने प्रवास करतात. त्यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या, "बसची एक फेरी सकाळी असावी. सकाळच्या पाळीत पेपर असला की आमची फरपट होते. ही बस सकाळी साडेअकरा वाजता व सायंकाळी साडेसहालाच येते. परीक्षेच्या काळात आम्हाला उमरेडला ओळखीच्या कुणाकडे तरी मुक्काम करावा लागतो. कारण सकाळी उमरेडला जायला दुसरे साधन नाही. अभयारण्य असल्याने खासगी गाड्या येत नाहीत. सायकलने प्रवास जीवघेणा ठरू शकतो. याबाबत तक्रार केली. तुमच्यासाठी बसची वेळ बदलायला येथे बसलो का, असे उर्मट उत्तर एसटीचे कर्मचारी देतात. येथून दररोज 50 ते 60 विद्यार्थी शिक्षणासाठी उमरेडला येतात.

घरी कसं जावं
प्रियांका देशपांडे ही पाचवीत शिकते. तिलाही विदारक अनुभव आलेत. कधीकधी वेळेवर बस येत नाही. शाळेत उशीर झाला की शिक्षकांचे बोल ऐकावे लागतात. पाच वाजता शाळा सुटण्याची वेळ आहे. शाळेतून बसस्थानकावर येईपर्यंत 20 मिनिटे लागतात. मात्र, सव्वापाचलाच बस सुटते. काय करावं, घरी कसं जावं, कळत नाही. उशीर झाला तर घरचे ओरडतात.

आमच्या लेकरायनं शिकावं
बसमध्ये देवका मसराम, मंजुळा फुकट, बालचंद मेश्राम, दादू गेडाम आदी वयोवृद्ध बसले होते. त्यांनी तर तक्रारींचा पाढाच वाचला. आम्ही तर आता म्हातारे झालोत. पण, आमच्या लेकरायनं शिकावं, अशी आमची इच्छा आहे, जाण्या-येण्याचे एकमेव साधन एसटी आहे. ती नियमित यावी. दिवसातून तीनदा यावी. आधीच वन्यप्राण्यांमुळे जीव मेटाकुटीस आला आहे.

...तर आमची नोकरीच जाईल
अभयारण्याच्या आत हे गाव आहे. कितीही हळू बस चालविली, वेगमर्यादा सांभाळली तरी गाडी चालवताना जीव धकधक करीत असतो. कुठूनही एखादा वन्यप्राणी गाडी खाली आला तर आमची नोकरीच जाईल, एसटीचे चालक मनीष खोंडे सांगत होते.

रात्रभर झोप लागत नाही
या रस्त्यावर वाघ नेहमी ठाण मांडून बसतो. एखादा वाघ चुकूनही गाडीखाली आला अशी कल्पना जरी मनात आली, तरी रात्रभर झोप लागत नाही, अशी भीती वाहक कमलेश कांबळे यांनी व्यक्त केली.

1 comments:

sanwad.24taas@gmail.com said...

बस प्रवासाची व्यथा सांगणारा हा उपक्रम खरच उल्लेखनीय आहे.या मुळे आम्हालाही हा प्रवास परत जगायला आणि शिकायला मिळाला.
सकाळ,ग्रामीण
सतिश घारड

Post a Comment

 
Blogger Templates