23 Jul 2016

न्यायालयात झेलला हातावर चाकू

 - बच्चू ऊर्फ कृष्णकुमार तिवारी
जिल्हा सत्र न्यायालयात एका हत्याकांडाचा खटला सुरू होता. मात्र, कोर्टातच दोन्ही टोळ्यातील सदस्य अचानक आक्रमक झाले. एकमेकांवर सशस्त्र हल्ला सुरू झाला. कुख्यात आरोपीने दुसऱ्या गटातील एकाच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्तव्यावरील बच्चू ऊर्फ कृष्णकुमार तिवारी यांनी तो चाकू आपल्या हाताने अडविला. त्यामुळे एका युवकाचे प्राण वाचले.


कृष्णकुमार ऊर्फ बच्चू अंबिकाप्रसाद तिवारी (इतवारी, कीर्तीनगर) यांना शालेय वयापासूनच वर्दीचे आकर्षण. वडील पोलिस खात्यात पोलिस उपनिरीक्षक असल्यामुळे खाकीचा पूर्वीपासूनच सन्मान. 1989 मध्ये पहिल्याच भरतीत पोलिस दलात निवड झाली. जवळपास 28 वर्षे पोलिस दलात त्यांनी इमानेइतबारे नोकरी केली. गेल्या तीन वर्षांपूर्वी 2012 मध्ये ते जिल्हा न्यायालयात कर्तव्यावर तैनात होते. दरम्यान, सीताबर्डीतील मोची टोळीने दुसऱ्या टोळीतील एकाचा खून केला होता. तो खटला न्यायालयात सुरू होता. फिरोज आणि जहरूद्दीन खान या दोन्ही टोळ्यांची सीताबर्डीत दहशत होती. गॅंगवारमधून हत्याकांड झाले होते. दुपारची वेळ होती. दुसऱ्या माळ्यावर खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायालय परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याची कमान हवालदार बच्चू तिवारी यांच्याकडे होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून ते सतर्क होते. मात्र, सुनावणीनंतर दोन्ही गटाचे सशस्त्र असलेले समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यांनी एकमेकांवर हल्ला चढविला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले. फिरोज नावाच्या कुख्यात गुंडाने खिशातून चाकू काढला आणि जहरूद्दीन याच्या पोटात खुपसण्याच्या तयारीत होता. मात्र, बच्चू तिवारी यांची चौफेर असलेली नजर फिरोजकडे गेली. निशस्त्र असतानाही त्यांनी लगेच उडी घेऊन जहरूद्दीनच्या पोटाजवळ गेलेला चाकू हाताने अडविला. त्यामुळे त्यांच्या हाताला जखम झाली. यात जहरूद्दीनचे त्यांनी प्राण वाचविले. लगेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन्ही गटातील युवकांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांना सदर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. जहरूद्दीन हासुद्धा गुन्हेगार होता. मात्र, तो प्रथम माणूस नंतर गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याचे प्राण वाचविणे माझे कर्तव्य होते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या रिवार्डपेक्षा त्याचे प्राण वाचविल्याचे मला समाधान असल्याचे हवालदार बच्चू तिवारी सांगतात. रात्रंदिवस कर्तव्यासाठी तैनात राहावे लागत होते. अनेक वेळा बाहेर राज्यात तपासासाठी आठ-दहा दिवस राहावे लागते. मात्र, आई सरस्वती आणि पत्नी किरण यांनी वेळोवेळी प्रोत्साहन आणि मनोधैर्य वाढविले. दोघेही भाऊ पोलिस विभागात यावे, अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे मी आणि मोठे भाऊ त्रियोगी यांनी खूप मेहनत घेतली आणि दोघेही भाऊ पोलिस खात्यात रुजू झालो. सध्या मी गुन्हे शाखेत कार्यरत आहे.
 
Blogger Templates