27 Apr 2016

दररोज दहा हजार नागरिकांच्या

ग्लासात ‘डर्टी वाॅटर’ 
 
- राजेश प्रायकर - सकाळ वृत्तसेवा

नागपूर - आंभोऱ्यापर्यंत शहरातील सांडपाणी प्रवाहित करणाऱ्या नागनदीला तीन संगम आहेत. या परिसरातील १५ ते २० गावांच्या भूगर्भातील पाणी दूषित झाले. मात्र, ही गावे अद्याप प्रशासनाच्या कक्षेबाहेर असल्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही. त्यामुळे दहा हजारांवर नागरिकांना दूषित पाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या गावकऱ्यांना जलजन्य आजार नित्याचीच बाब झाली असून, प्रत्येक घरात एक आजारी व्यक्ती आढळून येत असल्याने प्रशासनाच्या नाकर्तेपणाने कळस गाठला म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शहरातील घाण वाहून नेणाऱ्या नागनदीला पावनगाव येथे पिवळी नदी मिळते. अगदी शहराच्याच बाजूला हा संगम आहे. शहरापासून ३१ किलोमीटर अंतरावर शिवनी गाव आहे. येथे हिंगण्याकडून वाहत येणाऱ्या पोरा नदीतील घाण नागनदीच्या घाणीत भर घालते. हिंगण्याकडून येणारी पोरा नदी बेसा, हुडकेश्‍वर, नरसाळा या आता शहराचाच भाग झालेल्या परिसरातून घाण वाहून नेते. विहीरगाव, तरोडी बुजुर्ग, खेडी आदी गावांच्या शिवेतून वाहणाऱ्या या नदीने या गावातील पाणी दूषित केले आहे. शिवनी येथे पोरा व नागनदीचा संगम होत असल्याने दोन नद्यांच्या घाणीचा ‘डबल डोस’ या गावासह झरप, भानेवाडा आदी गावांना मिळत आहे. पुढे शहरापासून ५४ किलोमीटर अंतरावर सावंगी मोठी येथे नागनदी कन्हान नदीला मिळते. काही अंतरापर्यंत नाग व कन्हानचे पाणी समांतर वाहते. परंतु, नागनदीचे पाणी कन्हानमध्ये शिरल्यानंतर कन्हानही काळ्या पाण्याचा नालाच दिसून येत आहे. कुही तालुक्‍यातील मोठी सावंगी, छोटी सावंगी, चापेगडी, मोहगाव, आगरगाव, चिचघाटलाही काळ्या पाण्याने कवेत घेतले.

शिवनी परिसरात गॅस्ट्रो कायम
शिवनी येथील संगम परिसरात घनदाट जंगल असल्याने अनेक वर्षांपासून शिवनी, झरप व भानखेड्यातील नागरिकांनी फिरकूनही पाहिले नाही. अशावेळी या दूषित पाण्याची दखल घ्यायला प्रशासन येथे पोहोचण्याची कल्पनाही करणे गैर आहे. या परिसरातील बोअरवेलमधून येणाऱ्या पाण्यातून विविध आजारच नागरिकांच्या घरात पोहोचत आहे. गॅस्ट्रो, डायरियाचे रुग्ण या परिसरात दररोज दिसून येतात.
 
Blogger Templates