17 Jan 2017

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने....

बाळू दत्तात्रय राठोड,
बाळू दत्तात्रय राठोड
मुलगी शिकली प्रगती झाली असे नेहमी म्हटल्या जाते त्याचे कारण म्हणजे एक मुलगी शिकून ती आपल्या परिवाराला शिक्षित करण्याचे अनमोल कार्य करीत असते. प्रत्येक स्त्रीला आई, बहीण, बायको, मुलगी, मावशी अशा अनेक नात्यांची, जबाबदारीची लेबल्स असतात आणि ही सर्व नाती त्या व्यवस्थितरीत्या पार पाडत असतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या अंगी असणारे "कौशल्य' पणाला लावावे लागते. याच कौशल्याच्या बळावर ती पुढे जात असते, प्रगती करीत असते. या सगळ्या कुशल व्यवस्थापनामुळे "तिची कुटुंबाची कुशल मॅनेजर' म्हणून ओळख झालेली आहे. एक कुशल व्यवस्थापक म्हणून तिचा प्रवास पाहण्यासारखा, शिकण्यासारखा असतो.
आज महिला अनेक क्षेत्रांत प्रगती करीत असल्याचे दिसते. मुलगी, सून, बायको, माता या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, व्यवस्थापकीय संचालक, पत्रकार, सैनिक, साहित्यिक, कुलगुरू अशा अनेक रूपांनी आज तिची ओळख निर्माण होऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तिने निर्माण केले आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. उत्तम नेतृत्व देऊन ती आता स्वतःला समाजासमोर सिद्ध करू लागली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या पुढे आहे. हे सगळं असताना दुसऱ्या बाजूचा विचारही करण्याची आवश्‍यकता आहे. समाजाचा काही वर्ग अजूनही जिथे होता तिथेच असल्याचे दिसते. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्षित, अंधश्रद्धा, कौटुंबिक छळ, हुंडाप्रथा अशा अनेक सामाजिक समस्येच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. बदलाच्या दिशेने आणून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी समाजातील शिक्षित महिलांनी पुढे येण्याची खरी गरज आहे. भारताला विविध क्षेत्रांत मोठी प्रगती करायची असेल तर महिला सक्षमीकरण अत्यावश्‍यक आहे हे ओळखून देशात महिला सक्षमीकरणाचे धोरण मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. कौशल्य शिक्षणातून महिलांना विकसित केले जात आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या शासनाच्या अनेक योजना आहेत; पण खरी गरज आहे ती समाज, देश आणि महिलांनी एकत्रित येऊन समाजातील काही महिलांपुरतेच काम न करता तळागाळातील महिलांच्या समस्या जाणून त्यांच्यासाठी प्रयत्न करण्याची.
महिला सबलीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे महिलांचा विकास होतो आहे. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता जागतिकीकरणामुळे शिक्षण, आरोग्य, प्रशासनासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली आहे. राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सामर्थ्य वाढविणे, स्वतःच्या क्षमता विकसित करणे, निर्णयक्षमता, आत्मविश्‍वास निर्माण करून स्वतःचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व फुलविणे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून सन्मानाचे व प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची व्यवस्था निर्माण करणे म्हणजेच सक्षमीकरण होय. खरे तर सक्षमीकरणाच्या व्याख्येची व्याप्ती फार मोठी आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन अनेक स्तरावर प्रयत्न करीत आहे. अनेक योजना त्यासाठी कार्यरत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने 2001 साली राष्ट्रीय धोरण जाहीर केले. महिलांचे सक्षमीकरण व विकास घडवून आणणे. सर्वच क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे. महिलांना न्याय मिळवून देणे. अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू. 1994 मध्ये महिला धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले. आता "बेटी बचाओ, बेटी पढाओ व बेटी बढाओ' असा नारा घेत शासन स्तरावर महिलांसाठी काम सुरू आहे. सध्याचा विचार करता महिलांचे कौशल्य विकसित होईल या हेतूने अनेक स्तरावर काम सुरू आहे. अनेक संस्था, विद्यापीठे व शासन यावर काम करीत आहे. नुकताच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून तरुणींना व महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास विभाग, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठांमधील कॅम्पसमध्ये तरुणींना व महिलांना विविध प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध केल्या जाणार आहे. मुलींसाठी शिक्षण देणाऱ्या संस्था या सावित्रीबाई फुलेंचे कार्य खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत. मुलींच्या सबलीकरणासाठी मुलींना शिक्षण देत असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. कौशल्य शिक्षणातून महिला सक्षमीकरण होण्याचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे आज दिसते.
विविध योजना राबवून राज्य व केंद्र शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले टाकत आहेत. यात शासकीय महिला वसतिगृहे, महिला संरक्षणगृहे, आधारगृहे, महिला मंडळांना सहायक अनुदान, व्यावसायिक प्रशिक्षणार्थी मुलींना विद्यावेतन, स्वयंरोजगारासाठी महिलांना आर्थिक अनुदान, विवाह अनुदान, देवदासींसाठी कल्याणकारी योजना, बहुउद्देशीय महिला केंद्र, हुंडा दक्षता समिती, कामधेनू योजना, महिला व बालकल्याण समिती अशा प्रकारच्या अनेक योजना महिलांसाठी राबविल्या जातात. या योजना महिलांपर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी शिक्षित महिलांनी व स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.
महिलांकडे अनेक कौशल्य असतात. या अनेक कौशल्यामधून ती स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाला पुढे नेत असते. मल्टिटास्किंग, नवीन शिकण्याची उत्तम शैली, निर्णय घेण्याची क्षमता, अलर्ट, फ्लेक्‍झिबल व ऑर्गनाईज्ड असणे, जबाबदारी घेण्याची कुवत, उत्तम स्वच्छता राखणे, सहनशीलता, उत्तम व्यवस्थापन, संघर्ष करण्याची तयारी, कुटुंबाला जोडून ठेवणे असे अनेक कौशल्य सोबत घेऊन ती स्वतःला सिद्ध करीत असते. फक्त गर

ज आहे तिला स्वतःला ओळखण्याची. प्रत्येक मुलीचे लग्नानंतर आयुष्य बदलते. लग्नानंतरच्या पहिल्याच दिवसापासूनची दिनचर्या पाहिली तर आपण वेळेचे व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन, नातेसंबंध जोपासणे, घरातील आर्थिक बाजू समतोल ठेवणे, घरातील वातावरण सकारात्मक करणे, टीम वर्क, नवीन जागी स्वतःला सिद्ध करणे, कामाचे प्राधान्यक्रम निवडणे, आवडीनिवडी जोपासणे अशा प्रकारची अनेक व्यवस्थापकीय कौशल्ये तिच्याकडून शिकू शकतो. असे म्हटले जाते की, कोणत्याही देशाची सद्यस्थिती बघायची असेल तर त्या देशातील महिलांची स्थिती काय आहे हे बघायला हवे. अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखविणाऱ्या स्त्रीशक्तीला भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. म्हणूनच भारताला "माता' असे म्हटले गेले आहे.

बाळू दत्तात्रय राठोड,
नागपूर, 9881323543

1 comments:

Post a Comment

 
Blogger Templates