अशोक गवई
अशोक गवई हे मूळचे बुलडाण्यातील भादोला या खेडेगावातील. वडील शेतीकाम, तर आई शेतमजुरी करीत होती. कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण आटोपल्यानंतर अशोक हे 1985 ला कामाच्या शोधात नागपुरात आले. सुरुवातीला इमारतींवर विटा उचलण्याचे काम केले. पोलिस भरती निघाल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला. धष्टपुष्ट असलेल्या अशोक यांची पहिल्याच प्रयत्नात निवड झाली. पोलिस कॉन्स्टेबल म्हणून 1987 ला पाचपावली ठाण्यात रुजू झाले. जरीपटक्यात रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी मिळाली. त्यांनी लूटमार करणारे व अवैध दारूविक्रेत्यांच्या नाकी नऊ आणण्यास सुरुवात केली. अवघ्या चार महिन्यांत गवई यांचा दरारा निर्माण झाला. जरीपटका पोलिस ठाण्यात असताना चेनस्नॅचर व पाकीटमारांवर चांगलाच वचक बसविला. तलवारी किंवा चाकूच्या धाकावर दहशत निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने महिनाभरात जरीपटक्यातील शस्त्र वापरणाऱ्या टोळ्यांवर वचक निर्माण केला. नेतृत्वगुण लक्षात घेऊन तत्कालीन वरिष्ठांनी त्यांना क्राइम ब्रॅंचमध्ये संधी दिली. त्यांनी शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवणाऱ्या पथकात काम केले. सध्या ते नंदनवन पोलिस ठाण्यात सहउपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. एमओबी विभागात काम करताना त्यांनी तयार केलेला 18 गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे 10 गुंडांवर स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई झाली. जीवनाच्या कठीण काळात आई अनसूयाबाई व पत्नी माया या पाठीशी उभ्या राहिल्या. कर्तव्यावर वेळोवेळी तैनातीमुळे घराकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली गवई यांनी दिली.तीन दिवस आलेल्या पावसामुळे गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाला. नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे जरीपटक्यातील बहुतांश घरांत आठ ते दहा फूट पाणी साचले होते. पिवळी नदीच्या काठावर भदन्त कौसल्यायन नगरात वसलेल्या वस्तीतून पाणी वाहत होते. जवळपास सर्वांनीच वस्ती सोडली होती. मात्र, वृद्ध दाम्पत्य व मुलगा पुरात अडकले. नदीचा प्रवाह एवढा होता की पुलावरून दोन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे फायर ब्रिगेड, होमगार्ड व गोताखोरांना पाचारण केले. मात्र, कुणीही त्यांना वाचविण्याची हिंमत दाखविली नाही. सहायक फौजदार अशोक किसन गवई यांनी जिवाची पर्वा न करता पुरात उडी घेतली. मात्र, पाण्याच्या फोर्समुळे ते काही अंतर वाहून गेले. पुरातून निघून त्यांनी पुन्हा उडी घेतली आणि वृद्ध दाम्पत्याजवळ पोहोचले. एकेकाला पाठीवर बसवून दोरीच्या साहाय्याने त्यांनी पूर पार केला. त्यांच्या या कर्तृत्वाची तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, राज्याचे पोलिस महासंचालक बारवकर, नागपूरचे पोलिस आयुक्त सिंगारवेल यांनी दखल घेतली. तीन दिवसांनंतर गवई यांचा सत्कार करीत प्रशस्तिपत्र व रिवॉर्ड दिला. त्यावेळी राज्यभरातील प्रसारमाध्यमांनीही या घटनेची दखल घेतली होती.